उत्तराधिकारी
अनिरूध्दची फिएस्टा कुडोपी फाट्यावरून आत वळली नी कुपेरीच्या डोंगर कुशीत मठाचं गोपूर स्वच्छ दिसू लागलं… कच्चकन ब्रेक लावीत अनिरूध्दनं हात जोडले. ब्रेक लावताच ‘सारे जहाँसे अच्छा’ ची धुन वाजली.अकरा वर्षापूर्वी एस.एस.सी.ला ९४.२३ टक्के गुण मिळवून बोर्डात पहिला आलेला अनिरूध्द धुवट पांढऱ्या पिशवित कपडे भरून मुंबई गाडीची वाट पहात बसलेला. झीरोकट केस,भ्रुकुटी मध्यात अष्टगंधाची टिकली, खाकी पँट पांढरा शर्ट असा शाळेचा गणवेश घालून रूपारेल कॉलेजमध्ये दाखल झालेला भिक्षुकाचा मुलगा.‘हॅलो भटजी काका,रामपुर का लक्ष्मण’ असं जोरदार स्टंपींग झालं. ते आठवून त्याला हसू आलं. पुढे एम.एस्सी. ला फिजिक्समध्ये युनिव्हर्सिटीत फर्स्ट आल्यावर झालेला सत्कार, राज्यपालानी केलेलं कौतुक, विचारपूस. “आय विल रिमेंबर यु यंग किड… व्हेअर इज दिस कुडोपी?”
अयाचित वॄत्तीने भिक्षुकी करणारे षडशास्त्री वामन भटजी… कुडोपी, पळसंब, रामगड, चिंदर,त्रिंबक,आचरा,वायंगणी या सात गावात तंगडतोड करून मिळणाऱ्या भिक्षुकीच्या कमार्इवर पोसलेला रूटुखुटु संसार, तीन बहिणींच्या पाठीवर जन्मलेला, चौथे अपत्य म्हणून आचरा हायस्कूल मध्ये फी नादारीही न मिळालेला अनिरूध्द. बोर्डात पहिला आल्यावर मात्र त्याचं भाग्य उजळलं.आमदारानी अगदी जातिनीशी त्याच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी उचलली. मुंबर्इला नामांकित कॉलेज मध्ये अॅडमिशन,राहण्या जेवण्याची उत्तम सोय लागली. अनिरूध्दने त्याचं चीज केलं| मुंबर्इच्या मायानगरीचा मोह त्याला झाला नाही. बारीक केस अन् अष्टगंधाची टिकली ही त्याची आयडेंटीटी कधीच बदलली नाही|
पी.एच.डी. अॅवॉर्ड होण्यापूर्वीच बी.ए.आर.सी. कडून अॅप्रेण्टिसशीपची ऑफर आली. जॉईन होण्यापूर्वी आईबाबांचे , स्वामींचे आशिर्वाद घ्यायला अनिरूध्द कुडोपीला आला. बापलेक मठाकडे स्वामींच्या दर्शनाला निघाले. आगर ओलांडीत असता सौर सुक्ताची ऋचा कानी आली. तल्लख स्मॄतींच्या अनिरूध्दने मनातल्या मनात पठण सुरू केलं.अंगणाच्या कडेला पाटाच्या धारेवर पाय धुवुन दोघे मठात प्रवेशले. प्रसन्न मुद्रेने हाताने बसायची खूण करीत स्वामींनी ऋचा पूर्ण होताच पठण थांबवलं.
सध्याचे स्वामी हे मठाचे नववे उत्तराधिकारी. प्रत्येक पिढीत कुणी ना कुणी संन्यास घेऊन पीठ सुरू ठेवण्याचा प्रघात. मठ किंवा स्वामी तसे प्रसिध्दीच्या झोतात नसायचे. मात्र त्या परिसरात स्वामींचा अधिकार… त्यांचे अलौकिकत्व निर्विवाद असलेलं स्वामी पीठावर बसून उच्चारतील तो शब्द खरा ठरणार अशी भाविकांची अपार श्रध्दा. या श्रध्देला साजेल असं स्वामींच वागणं बोलणं विनम्र आणि सात्विक… त्यांच ज्ञान चतुरस्त्र आणि सर्वस्पर्शी! लागोपाठ तीन कन्या झाल्यावर वामन भटजींनी प्लॅनिंगचा विचार केलेला. पण “पुत्रप्राप्ती शिवाय मोक्ष नाही” हा स्वामींचा आदेश उभयतांनी शिरोधार्थ मानला अन् अनिरूध्दचा जन्म झाला.
दहावीच्या अभ्यासाचा धोशा सुरू होर्इपर्यंत अनिरूध्द नित्यनेमानं मठात जायचा, महिम्न, रूद्र, श्रीसूक्त,लक्ष्मी सूक्त, पुरूष सुक्त,सौर सुक्त, त्रिसुपर्ण, ऋग्वेद शाखेची धर्मकॄत्य अनिरूध्दला मुखोद्गत झाली ती स्वामींमुळे. बी.ए.आर.सी.त अॅप्रेण्टिस म्हणून जॉईन होण्यापूर्वी तो भक्तीभावाने स्वामींचे आशिर्वाद घ्यायला मठात गेलेला. त्यावेळी एन्रॉन प्रकरण रंगात आलेलं. स्वामींचा मार्ग आध्यात्मिक, दिनक्रम साधना भिन्न, अलिप्त संन्यस्त जीवन जगणारे स्वामी… पण देशात घडणाऱ्या घटनांची इत्यंभूत माहीती त्यांना असायची. ट्रान्झिस्टरवरच्या बातम्या ते नित्यनेमाने ऐकायचे.
“गॅट करार, एन्रॉन यांच्या रूपाने एक वेगळी गुलामगिरी विवशी हिंदुस्थानात येतेय… ”स्वामी म्हणाले “अनिरूध्द हे शासनकर्ते महाराष्ट्र विकायला निघालेहेत. सर्वसामांन्याना विजेच्या रूपाने संजीवनी देणारी एम.एस.ई.बी.तीच्या नरड्यावर टाच आणू पहात आहे हे सरकार. कुडोपीत नारळीसुपारीचं उत्पन्न निघतयं ते वीजेमुळे.पण उद्या हिच वीज सगळ्यांना कफल्लक बनवणारेय! मला स्वच्छ दिसतयं, विकासाच्या सगळ्या नाडया विद्युत उर्जेच्या ताब्यात अन् ही वीज शासनकर्त्यांची बटीक होणार. श्रीकॄष्ण परमात्म्याला प्रसवणारी देवकी कंसाच्या कारागॄहात बंदिवान झाली होती ना ? तव्दत परिस्थिती आहे. पण ही एम.एस. ई.बी. वंध्या आहे, नी तिचा धनी नपुंसक आहे.” दीर्घ श्वास सोडीत स्वामी पुढे बोलू लागले. “अनिरूध्द तुझ्याकडे कुशाग्र बुध्दी आहे. चांगल्या कंपनीचा आधार तुला मिळतोय. तू काही शासन उलथून टाकू शकणार नाहीस हे मान्य… पाऊस थांबवता येत नाही पण मस्तक झाकायला छत्री उघडता येते. ते कार्य तू कर. आर्यांच्या पवित्र संस्कॄतीचा तुला वारसा आहे. सौरसुक्ताचं निष्ठेनं चिंतन कर. तुला मार्ग सापडेल. एनन्रॉनचा कचरा व्हावा असा काही उपाय तू शोधून काढ. हे कुडोपीचं ऋण तुला फेडायचं आहे…” विचारांच्या तंद्रित घरासमोरचा तुळसांबा कधी आला ते अनिरूध्दला कळलचं नाही. कच्चकन ब्रेक दाबीत फिएस्टा थांबली. ‘सारे जहाँसे अच्छा’ ची धून पुन्हा एकदा वाजली.
बॉनेटवर तांब्यातलं पाणी ओतून आईने कुंकवाचं सुरेख स्वस्तिक काढलं. त्यावर तुळशीची मंजिरी आणि अनंताचं फुल ठेवलं. वामन भटजीनी नारळ वाढवून मोटारीवर पाणी शिंपडलं. खोबऱ्याची शिरणी काढून चार तुकडे चार दिशांना फेकले. एक तुकडा बॉनेटवर ठेवला.अनिरूध्दने गाडी स्टार्ट करून अंगणाच्या कडेला सावलीत लावली.‘सारे जहाँसे अच्छा’ घुमत असताना हातभर औरस चौरस लोखंडी पत्र्याची पेटी सांभाळीत अनिरूध्द गाडीतून खाली उतरला.
काय सांगू किती सांगू असं अनिरूध्दला झालेलं. “आई-बापू एक मोठा शोध लावलाय् मी! सगळं काही तुम्हाला समजणार नाही. पण सौर उर्जेवर चालणारं यंत्र आहे.या पेटीत काचेच्या आत चारणीाच्या पानांसारखी दिसणारी कार्बन पत्र दिसताहेन ना… ती सूर्यप्रकाशातली ऊर्जा शोषून घेतात. त्यांच्याखाली पेटीत एक जनित्र आहे त्यात सूर्यप्रकाशाचं विजेत रूपांतर होऊन ती साठवली जाते. सूर्याचे थेट उन्ह तासभर पडलं की पुरे अथवा नुसत्या उजेडात ही पेटी तीन तास ठेवली तर जी वीज तयार होर्इल ती एका कुटुंबाला दोन दिवस पुरेल. सहा दिवे, चार पंखे, फ्रिज, टी.व्ही. आणि अर्ध्या अश्व शक्तीची पाण्याची मोटार हे सगळं चालेल एवढी वीज यातून मिळेल. याचा खर्च फक्त बावीसशे रूपये. साधारण पाच वर्षानंतर आतली कार्बनपत्रं बदलावी लागतील.त्याचा खर्च येर्इल दीडशे रूपये.”
“या शोधाबद्दल खरंतर नोबेल पारितोषिक मिळायला हवं…पण…” “पण काय? पुढे बोल ना…” भटजी म्हणाले. “पण वरिष्ठ आणि राजकारणी यांनी माझ्यावर दडपण आणलंय्” नाही तरी नोबेल पारितोषिक काय देईल? एवढी संपत्ती माझा हा शोध खरेदी करण्यासाठी एक अमेरिकन कंपनी देऊ करतेय…अख्ख्या कुडोपी गावात अंथरता येतील एवढ्या नोटा… बाहेर आहे तसल्या दोन गाड्या मला भेट मिळाल्या आहेत. ही गाडी मी खास तुमच्यासाठी आणलीय्!” आई बापू कोणीच काही बोललं नाही.
संध्याकाळी वामन भटजी अनिरूध्दच्या गाडीत बसून मठात गेले. स्वामी अनिरूध्दकडे पहातच राहिले. “अरेऽऽ तुझं कपाळ उघडं कसं?” असं म्हणत स्वामींनी त्याच्या भ्रुकुटी मध्यात अष्टगंधाची टिकली लावली. त्या क्षणी सहस्त्र सुर्यांच्या तेजाने दिपून अनिरूध्दने डोळे मिटले. त्याच्या मस्तकावर थोपटीत स्वामी म्हणाले, “बाळ… भानावर ये… तू कोण आहेस याचा विसर पडू देवू नकोस…” भानावर येवून डोळे उघडीत अनिरूध्द बोलू लागला. “स्वामी ऽऽ क्षमा करा. माझी भ्रांती दूर झाली. एका दुष्टचक्रात मी जवळ जवळ अडकणारचं होतो. पण… मी त्यातून बाहेर पडणारेय्! निस्पृहस्य तृणम् जगत… लोभ मोह … आसक्ती यापासून मी मुक्त होणारेय!”
“स्वामी माझ्या अधिकाऱ्यांपासून ते महनीय राजपदस्थ व्यक्तींसह सर्वांनीच माझ्यावर प्रचंड दडपण आणलय्. एक तर अमाप द्रव्यराशी घेवून सुखोपभोग भोगणं… त्यासाठी माझा शोध मी त्यांना विकणं… अथवा कस्पटाप्रमाणे दूर फेकणं…. नोकरी जार्इलचं… कदाचित माझ्या जीवावरही उठतील ते. मी बनवलेलं एक सौर जनित्र त्यांच्या हातात आहे… पण सुटकेचा मार्ग मला दिसलाय स्वामी… मी अगोदरपासूनच त्याची खबरदारी घेतलीय्”
“माझ्या यंत्रात सौरशक्तीचं विद्युत उर्जेत रूपांतर करून साठविणारी यंत्रणा… मी ती डिकोड केलीय.त्याची रचना फक्त मीच उलगडू शकेन. अन्य कुणीही ती समजून घेण्यासाठी उघडू पाहिल तेव्हा योग्य कोड दिला नाही तर सगळं सर्किट नष्ट होर्इल. त्याचा कोड आहे ‘सौरसूक्ताचे पहिले पाच श्लोक’ म्हणताना एका स्वराचीही चूक झाली तरी कोड निरर्थक ठरेल. माझा शोध सहजासजी त्यांच्या हाती लागणार नाही. प्रश्न उरला माझ्या जिवीत वित्ताचा आहे. तो सोडवायचा उपायही सुचलाय मला. मठासारखी दुसरी सुरक्षित जागा नाही. या ठिकाणी सर्वसंग परित्याग करून संन्यस्त जीवन सुरू केल्यावर मला कुणाची भय भीतीही बाळगण्याचं कारण काय? स्वामी तुमच्या पश्चात तुमचा कोणी कुटुंबिय आजच्या परिस्थित संन्यास घेवून तुमचा वारसा चालवणार नाही. तुमचे उत्तराधिकार मी या क्षणी स्विकारतोय…मठाच्या उत्पन्नातून निदान कुडोपी एन्रॉनमुक्त करण्या एवढं भांडवल तरी नक्कीच उभं राहील. आता माझी साधना तीच असेल. आई- बाबा तुम्ही शांतचित्ताने घरी जा… मी आता संन्यास घेवून स्वामींचा उत्तराधिकारी म्हणून मठातच रहाणार आहे”
◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙


Superb story
उत्तर द्याहटवा